कवी आणि संगीतकार – ५

September 25, 2008 - 2 Responses

मागल्या भागात लिहिल्याप्रमाणे या भागात संगीतकार जयदेवच्या गाण्यांचा विचार करू. संगीतकार जयदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते “गाने में अगर कविता न हो तो वो सिर्फ एक चीज या खयाल बन जाता है और फिर उसका कुछ मतलब नहीं है” आणि खरोखर त्यांच्या संगीतामध्ये – चित्रपटात आणि गैरफिल्मी – कवितेचा प्रभाव चांगलाच दिसून येतो. संगीतकार जयदेव यांची गाणी ऐकल्याने अनेक नवीन कवींची ओळख झाली.

जयदेव खऱ्या अर्थाने दुर्दैवी संगीतकार म्हणता येतील कारण त्यांना संधी कमीच मिळाल्या. १९५५ मधल्या “जोरू का भाई” पासून सुरुवात केली तरी १९५५ ते १९७० या प्रदीर्घ काळात जोरू का भाई (गीतकार – साहिर, नरेंद्र शर्मा, विश्वामित्र आदिल), अंजलि(गीतकार – न्याय शर्मा) आणि समुंदरी डाकू(गीतकार – विश्वामित्र आदिल), हम दोनो (साहिर), मुझे जीने दो (साहिर), किनारे किनारे (न्याय शर्मा) आणि  ”हमारे गम से मत खेलो” अशा फक्त सात चित्रपटांना संगीत द्यायची संधी मिळाली. “जोरू का भाई” साहिरने लिहिलेली “सुबह का इंतजार कौन करें ” या गाण्याची तलत आणि लता यांनी गायलेली टॅंडेम व्हर्जन्स सुरेख आहेत. तीच गोष्ट  ”समुंदरी डाकू” मधल्या “दिल जवाँ है आरजू जवाँ” या विश्वामित्र आदिल यांनी लिहिलेल्या तलत आणि तलत- आशा यांनी गायलेल्या गाण्याच्या टँडेम व्हर्जन्सची.

 गीतकार न्याय शर्मांनी “अंजली” चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यातले “किस किस को दीपक प्यार करे” हे एकच गीत मी ऐकले आहे. मात्र “किनारे किनारे” मध्ये त्यांनी “जब गमे इश्क सताता है तो हँस देता हूँ (मुकेश), “चले जा रहे है मुहब्बत के मारे किनारे किनारे” (मन्ना डे), “देख ली तेरी खुदाई बस मेरा जी भर गया” (तलत) आणि “हर आस अष्कबार है हर साँस बेकरार है” (लता) अशी एकाहून एक सरस गीते लिहिली आहेत. त्यानंतर “रेश्मा और शेरा” मधले अतिप्रसिद्ध अशा “तू चंदा मैं चाँदनी” या गाण्यामुळे गीतकार “बालकवी बैरागी” नावाचे एक चांगले कवी आहेत हे समजले. “प्रेम पर्बत” मधले जाँ निसार अख्तर यांनी लिहिलेले “ये दिल और उनकी निगाहोंके साये” हे गाणे किती सुरेख आहे हे ज्यांनी ऐकले आहे त्यांना वेगळे सांगायला नको. पहाडी धुन, संतूर, बासरी आणि जाँ निसारचे ”पहाडोंको चंचल किरन चूमती है, हवा हर नदी का बदन चूमती है….. लिपटते ये पेडोंसे बादल घनेरे, ये पल पल उजाले ये पल पल अंधेरे.. ” यासारखे चित्रदर्शी शब्द  यातून एखाद्या हिल स्टेशनवरचा सूर्योदय जणू काय आपल्या नजरेसमोर उलगडतोय असा भास होतो. याच चित्रपटात सुप्रसिद्ध कवयित्री पद्मा सचदेव यांनी दोन गाणी लिहिली आहेत. “ये नीर कहाँ से बरसे बदरी कहाँसे आयी है” आणि “मेरा छोटासा देखो ये संसार है” ही लताने गायलेली गाणीही सुरेख आहेत. “परिणय”मधले शर्मा बंधूंनी गायलेले “सूरज की गर्मी से तपते हुए तन को मिल जाये तरूवर की छाया” हे गीतही प्रसिद्ध आहे(गीतकार – रामानंद शर्मा).  ”दिन खाली खाली बर्तन है रात है जैसे अंधा कुँआ इन सूनी अंधेरी आंखोंमें आँसूकी जगह आता है धुआँ” हे गुलजार यांचे घरौंदा मधल्या “एक अकेला इस शहर में” या गाण्यातले शब्द कोण विसरेल? “कोई गाता मैं सो जाता” ही हरिवंशराय बचचन यांची संस्कृतप्रचुर हिंदीतली येसूदासने गायलेली रचनाही मला आवडते. “क्या कोई नयी बात नजर आती है हम में आईना हमें देख के हैरान सा क्यूं है? ” असा प्रश्न”सीनेमें जलन आँखोंमें तूफान सा क्यूँ है”  या गाण्यातून शहरयार यांनी विचारला आहे.  अलिगढ मुस्लिम विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या शहरयार यांनी  “गमन” मध्ये पहिल्याने गीते लिहिली. मखदूम मोहिउद्दिन हे जरी लैकिकार्थाने गीतकार नसले तरी त्यांच्या अनेक रचना चित्रपटात गीते म्हणून आल्या आहेत. “दो बदन प्यार की आग मे जल गये” (चा चा चा – रफी – आशा), “जानेवाले सिपाहीसे पूछो वो कहाँ जा राहा है” (उसने कहा था – मन्ना डे), “फिर छिडी बात बात फूलोंकी” (बाज़ार) ही गाणी प्रसिद्ध आहेत तसेच “गमन” मधले “रातभर आपकी याद आती रही” हे छाया गांगुलीने गायलेले गाणेही माझे अतिशय आवडते आहे. याशिवाय आणखी एका कवीबद्दल लिहिले नाही तर हा लेख अपूर्ण राहील. तो म्हणजे सुदर्शन फाकीर. “दूरियाँ” या एकाच चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. बाकी त्यांची गैरफिल्मी गाणी – खास करून जगजीत सिंगने गायलेले “ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो” तसेच बेगम अख्तरने गायलेली गाणी जास्त प्रसिद्ध आहेत. पण “दूरियाँ”मधले “जिंदगी मेरे घर आना” हे माझे अतिशय म्हणजे अतिशयच आवडते गीत आहे. सर्वच गीत टंकायचा मोह मुष्किलीने आवरून एकच कडवे इथे देतो.

मेरे घर का सीधासा इतना पता है
मेरा घर जो है चारो तरफ से खुला है
न दस्तक जरूरी न आवाज देना
मेरे घर का दरवाजा कोई नहीं है
है दीवारें गुम और छत भी नहीं है
कडी धूप है तो २
तेरे आँचल का साया चुराके जीना है जीना ज़िंदगी
मेरे घर आना ज़िंदगी

अनेक संतकवींच्या रचनाही जयदेवने लता, आशा, भीमसेन जोशी अशा लोकांकडून गाऊन घेऊन अजरामर केल्या आहे. “कौनो ठगवा नगरिया लूटल हो” (कबीर – आशा – अनकही), रघुवर तुमको मेरी लाज (तुलसीदास – भीमसेन – अनकही), हरी आओ हरी आओ (सूरदास – भीमसेन – अनकही), मैं जानू नाही (मीराबाई – लता – चांदग्रहण).

चित्रपटसंगीताव्यतिरिक्त जयदेव यांनी हिंदी- उर्दूमधील प्रसिद्ध रचना आशा भोसलेकडून गाऊन घेतल्या आहेत. “निराला”, महादेवी वर्मा, नरेंद्र शर्मा तसेच गालिब, वगैरे कवी शायरांच्या रचना त्यात आहेत. त्यातले “मन तुमुल कोलाहल कलय में मैं हृदय की बात रे” हे गाणे ऐकणे हा “आऊट ओफ वर्ल्ड” अनुभव आहे.

एखादे व्रत घेतल्यासारखा आयुष्यभर चांगल्या कवितांवर आधारित गाणी देणारा जयदेव ५ जानेवारी १९८७ ला गेला. अनेक तरूण मित्रमैत्रिणी मला विचारतात “काका तुम्हाला नवीन गाणी आवडतच नाहीत का? ” मी त्यांना सांगतो “माझ्यासाठी चांगले संगीत ५ जानेवारी १९८७ ला संपले.”

कवी आणि संगीतकार – ४

September 23, 2008 - Leave a Response

संगीतकारांची विभागणी तीन प्रकारात करता येते असे पूर्वी लिहिले आहे भाग २ व ३ मध्ये त्यापैकी दोन प्रकारच्या संगीतकारांची उदाहरणे दिली. माझ्या मते सर्वात महत्त्वाचा संगीतकारांचा प्रकार तिसरा. यातले संगीतकार प्रस्थापित गीतकारांबरोबरच इतर अप्रसिद्ध गीतकारांबरोबरही काम करतात. माझ्या मते असे संगीतकार फक्त तीन. १. अनिल बिस्वास २. रोशन. ३. जयदेव.

या तिघांबद्दल थोडासा अभ्यास केला असल्याने त्याबद्दल काही ठोस बोलू शकतो.

अनिल बिस्वास

असामान्य प्रतिभेचे संगीतकार. विशेषतः लताचा आवाज जसा त्यांच्या गाण्यात “लागतो” तसा अन्य कुठल्याही संगीतकाराच्या गाण्यात लागत नाही असे जाणकार म्हणतात. अर्थात संगीताबद्दल काहीच समजत नसल्याने त्याबद्दल काही लिहू शकत नाही. पण एके ठिकाणी त्यांनी “In my music poetry is the queen” असे म्हटले होते. या लेखमालेच्या पहिल्या भागात लिहिलेले दहा – बारा आणि ज्यांची नावे राहून गेली असे इंदीवर, कैफी आजमी, राजा मेहंदी अली खाँ, असद भोपाली, एस. एच. बिहारी असे आणखी ८ – १० गीतकार धरले तर २० – २५ गीतकार हे प्रस्थापित गीतकार समजायला हरकत नाही. पहिल्या व दुसऱ्या भागात वर्णन केलेल्या संगीतकारांची मजल या लोकांपलिकडे जात नाही. अनिल, रोशन आणि जयदेव यांनी मात्र यापेक्षा कितीतरी जास्त गीतकारांबरोबर काम केले आहे.

पहिल्याने अनिल बिस्वास यांच्याबद्दल बघू. अनिल बिस्वास म्हटले की प्रेम धवन यांचे नाव समोर येते. ते खरे आहे. बऱ्याच चित्रपटात प्रेम धवन यांनी गाणी लिहिली आहेत. पण किती गीतकारांबरोबर त्यांनी काम केले याची थोडी कल्पना यावी म्हणून काही आकडेवारी देतो. लता मंगेशकरांनी १९४८ मध्ये अनिल बिस्वास यांच्या “अनोखा प्यार” आणि “गजरे” या चित्रपटात प्रथम गाणी गायली तेव्हापासून १९६५ साली आलेल्या “छोटी छोटी बाते” या अनिलदांच्या शेवटच्या चित्रपटांपर्यंत मोजणी केली. एकूण ३४ चित्रपटांसाठी तब्बल ४२ गीतकार! अजूनही १९३५ मधल्या “धरम की बेटी” पासून १९४८ पर्यंतच्या चित्रपटांची मोजणी आम्ही करतच आहोत. यात वर सांगितलेल्या २० – २५ प्रस्थापितांपैकी बरेच आहेत तसे इतर अप्रसिद्ध गीतकारही खूप आहेत. गुलजार, नीरज, योगेश अर्थातच नाहीत पण मजेची गोष्ट म्हणजे इंदीवर आणि आनंद बक्षी आहेत. इंदीवर यांनी लिहिलेली दोन सुंदर गाणी प्रसिद्ध आहेत. एक “दिल शाम से डूबा जाता है (आशा – संस्कार) आणि दुसरे “जीवन है मधुबन (तलत – जासूस).

आकड्यांचे महत्त्व लक्षात यायला तुलना म्हणून सांगतो शंकर – जयकिशन यांनी शैलेंद्र – हसरत जोडीबरोबर १२५ चित्रपट केले. नौशाद यांनी १९४६ सालच्या “दर्द”पासून १९७१ मध्ये शकीलचे निधन होईपर्यंत फक्त त्यांच्याच बरोबर काम केले अपवाद अंदाज, साथी (दोन्ही मजरूह) आणि साज और आवाज (खुमार बारा बंकवी). सचिनदेव बर्मन यांची ख्याती संगीताच्या गरजेनुसार गीतकार बदलणारे अशी आहे, त्यांनी सुद्धा ७५ चित्रपटांसाठी फक्त २५ गीतकारांबरोबर काम केले.

नुसत्या आकडेवारीपेक्षा काही गाणी आणि त्यांचे गीतकार अशी उदाहरणे देतो, उदाहरणे अर्थातच अप्रसिद्ध गीतकारांची आहेत. याद रखना चाँद तारों (लता – अनोखा प्यार -जिया सरहदी), बरस बरस बदली भी बिखर गयी (लता – गजरे – गोपालसिंग नेपाली), मन में नाचे मन की उमंगे (लता – बेकसूर – एहसान रिजवी), बेईमान तोरे नैनवा (तराना – लता – डी. एन. मधोक), तेरा खयाल दिल से मिटाया नहीं अभी (तलत – दो राहा – जोश मलीहाबादी), कह दो के मुहब्बत से टकराए जमाना (मान – लता – कैफ भोपाली), रामरस बरसे (सी. एच. आत्मा – महात्मा कबीर – चंद्रशेखर पांडे), झिलमिल सितारोंके तले आ मेरा दामन थाम ले (नाज – लता – सत्येंद्र), मुख से न बोलूँ (जालियनवाला बाग की ज्योती – तलत – लता – उद्धवकुमार),

 मला असे वाटते की जे संगीतकार अनेक गीतकारांबरोबर काम करतात त्यांची गाणी सदा टवटवीत वाटतात. शकील – नौशाद, किंवा सी. रामचंद्र – राजेंद्र कृष्ण किंवा अगदी शैलेंद्र असूनही  शंकर – जयकिशनची गाणी पुढे पुढे कंटाळवाणी होतात तसे अनिल, रोशन आणि जयदेवचे होत नाही.  

असो या भागात अनिल आणि जयदेव बद्दल लिहून पुढच्या भागात रोशनबद्दल लिहून लेखमाला संपवायची असा बेत होता पण आता जयदेवसाठी एक आणि रोशनसाठी दुसरा असे दोन भाग लिहावे लागणार असे दिसते.

कवी आणि संगीतकार – ३

September 21, 2008 - Leave a Response

या भागात प्रामुख्याने अशा संगीतकारांबद्दल लिहायचे आहे ज्यांनी अनेक गीतकारांबरोबर काम केले पण असे गीतकार सुस्थापित होते. यात १. सचिनदेव बर्मन २. मदन मोहन ३. हेमंतकुमार ४. चित्रगुप्त व ५. ओ. पी. नय्यर ६. रवी यांचा समावेश करता येईल.

सचिनदेव बर्मन – यांचा मुख्य भर साहिर, मजरूह, शैलेंद्र आणि आनंद बक्षी या चार गीतकारांवर असला तरी इतरही अनेक गीतकारांबरोबर काम केले आहे. यांच्या संगीतात इतके वैविध्य आहे की कुठलाही एक गीतकार त्यासाठी योग्य आहे असे त्यांना वाटत नसावे. पण त्यांना कवितेची जाण होती, ते कवितेच्या दर्जाबद्दल आग्रही होते असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एक तर त्यांना हिंदी भाषाच नीट समजत नसे. देव आनंदच्या चित्रपटांसाठी प्रामुख्याने संगीत दिल्याने हलकी फुलकी गाणी दिली.

मदनमोहन – यांचा मुख्य भर राजेंद्र कृष्ण, मजरूह, कैफी आजमी आणि राजा मेहंदी अली खाँ यांच्यावर होता. मला जरी राजेंद्र कृष्णची गाणी आवडत नसली तरी बाकी तिघांनी मदनमोहनकडे सुंदर गाणी लिहिली आहेत. खरे तर कैफी आणि राजा मेहंदी अली खाँ चित्रपटसृष्टीत टिकून राहिले (विशेषतः १९६० नंतर) ते मदनमोहनच्या आधारावर असे म्हणावे लागेल. याशिवाय खुद्द मजरूह यांनीच मदनमोहन यांना कवितेची जाण असल्याचे सांगितले आहे.

हेमंतकुमार – यांच्याकडे असंख्य गीतकारांनी गाणी लिहिली. स्वतः हेमंतकुमार काही बोलले नसले तरी अनुपमा, कोहरा (दोन्ही कैफी), गर्ल फ्रेंड (साहिर), खामोशी (गुलजार), बीस साल बाद आणि साहिब बिबी और गुलाम (शकील), आनंदमठ (बंकिमचंद्र, “गीतगोविंद” वाले जयदेव, शैलेंद्र),  दुर्गेशनंदिनी, मिस मेरी (यातली राजेंद्र कृष्ण यांची गाणी मला आवडतात)  यामधली गाणी ऐकल्यावर यांना कवितेची जाण असावी असे वाटते.

चित्रगुप्त – यांचा भर प्रामुख्याने मजरूह, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण यांच्यावर असतो. एकूण काव्याचा दर्जा चांगला असतो.

रवी – साहिर आणि शकील यांनी जास्त गाणी लिहिली असली तरी इतरही असंख्य गीतकारांनी गाणी लिहिली. साहिरने लिहिलेली गाणी जरी प्रसिद्ध झाली असली तरी मला साहिरची जयदेव, रोशन, खय्याम यांची गाणी जास्त आवडतात. रवी स्वतःही गीतकार आहेत.

ओ. पी. नय्यर – माधव मोहोळकरांनी साहिरला प्रश्न विचारला होता “आपल्या चालीपेक्षा कवीच्या कवितेला जास्त महत्त्व देणारा संगीतकार कोण? ” त्यावर साहिरने एकच नाव सांगितले – ओ. पी. नय्यर. अर्थातच मला हे पटत नाही. साहिरने ओपीकरता अडीच चित्रपटांसाठी गाणी लिहिली. नया दौर, सोने की चिडीया आणि १२ बजे (मजरूह बरोबर). त्यातली सोने की चिडीया मधली गाणी चांगली आहेत. पण सचिनदेव बर्मन आणि जयदेव बरोबर भांडणे झाल्याने साहिरने त्यांची नावे गाळली का? रोशन, खय्याम यांची का घेतली नाहीत हे प्रश्न मला सुटले नाहीत. त्याचा मुख्य भर साहिर, मजरूह आणि एस. एच. बिहारी यांच्यावर असतो. ओपी स्वतः असे म्हणतो की मी कुठल्याही मोठ्या गीतकारावाचून अडून बसत नाही आणि गीतकारांना नवीन कल्पना लिहिण्यासाठी उद्युक्त करतो. अर्थात ओपीच्या गाण्यातले काव्य बघता साहिर आणि ओपी दोघांवरही विश्वास बसत नाही.

कवी आणि संगीतकार – २

September 21, 2008 - 2 Responses

पहिल्या भागाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे संगीतकाराला कवितेची जाण असते का, असल्यास त्याचा त्याने संगीत दिलेल्या गाण्यांवर परिणाम होतो का या विषयावर लिहायचे आहे. कित्येकांना हा उपद्व्याप निरर्थक वाटेल. एक तर गीतकाराला गाणे लिहिताना गाण्याची सिच्युएशन, संगीतकाराने आधीच बांधलेली चाल, वाद्यसंगीत धरून तीन मिनिटांची मर्यादा वगैरे बंधनात राहून गाणे लिहायचे असते वर ते निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार अशा सर्वांना पसंत पडले पाहिजे. इतके सगळे व्हेरिएबल्स असताना एकट्या संगीतकाराच्या काव्यविषयक मतांचा असा किती परिणाम होणार याबद्दल अनेकांना शंका असेल.

पण असा विचार करण्यामागे काय कारण आहे ते सोदाहरण सांगतो. मजरूह सुलतानपुरीचे उदाहरण घेऊ. त्याने १९४६ ते २००० या सुमारे ५५ वर्षात कमीतकमी ५००० (कदाचित १०, ००० पण) गाणी लिहिली असावीत अशी वदंता आहे. बहुतेक सर्व संगीतकारांबरोबर काम केले. पण त्याची चांगली गाणी शोधायची झाली तर अनिल बिस्वास (फरेब), नौशाद (अंदाज, साथी), रोशन (ममता, आरती, भीगी रात, दादी माँ, चाँदनी चौक), मदनमोहन (दस्तक), चित्रगुप्त (ऑपेरा हाऊस, काली टोपी लाल रुमाल)  अशी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संगीतकारांबरोबर केलेली गाणी आठवतात. राहुलदेव बर्मन आणि लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांच्याबरोबर केलेली अक्षरशः हजारो गाणी सुमार ते टाकाऊ अशी आहेत. हा फरक का दिसतो? काही लोक म्हणतील हा काळाचा महिमा आहे. तर सचिनदेव बर्मन, ओ. पी. नय्यर यांच्याबरोबर केलेली गाणी बघा. ती पण खास नाहीत. हे तर अनिल बिस्वास, रोशन, मदनमोहन वगैरेंना समकालीन आहेत ना? मग असा फरक का दिसतो?स्वतः मजरूह एके ठिकाणी म्हणाले होते “मी काम केलेल्या संगीतकारांपैकी फक्त रोशन आणि मदनमोहन यांनाच कवितेबद्दल आस्था होती”

गेली अनेक वर्षे यावर विचार केला आणि जी काही जुजबी माहिती उपलब्ध झाली त्यावरून पुढचे विवेचन केले आहे.  

संगीतकार एकूण तीन प्रकारचे असतात. १. प्रामुख्याने एकाच गीतकाराबरोबर काम करणारे, २. अनेक गीतकारांबरोबर काम करणारे पण बहुतेक वेळा चित्रपटसृष्टीत नाव कमावलेल्या गीतकारांबरोबरच काम करणारे. ३. सतत नवीन कवी आणि कविता यांच्या शोधात असणारे

१. प्रामुख्याने एकाच गीतकाराबरोबर काम करणारे 

याची उदाहरणे म्हणजे नौशाद (शकील बदायुनी), शंकर – जयकिशन (शैलेंद्र – हसरत), सलील चौधरी (शैलेंद्र), सी. रामचंद्र (राजेंद्र कृष्ण). यापैकी नौशाद, शंकर – जयकिशन आणि सलील चौधरी यांनि संगीत दिलेल्या गाण्यात असंख्य चांगल्या कविता आढळतात तर सी. रामचंद्र यांच्या संगीतात आढळत नाहीत. पण माझ्या मते केवळ शैलेंद्र आणि शकील चांगले कवी असल्याने असे झाले आहे, त्यात संगीतकारांचा वाटा फारसा नाही.

नौशाद रागदारीवर आधारित संगीताबद्दल प्रसिद्ध आहेत. आपल्या चालीबद्दल इतके काटेकोर असतात की शकीलने लिहिलेले शब्द चालीत बसत नसतील तर त्यात हवा तो बदल करण्यासाठी एक वेगळा कवी पदरी बाळगला होता असे मध्यंतरी वाचले. यावरून कवितेबद्दलचा त्यांचा दृष्टीकोण लक्षात यावा.

स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा दुसरा संगीतकार म्हणजे सलील चौधरी. हिंदी चित्रपटात पदार्पण करायच्या आधीच त्यांनी निरनिराळ्या चाली तयार करून, त्यावर बंगाली भाषेत स्वतः गाणी लिहून ती स्वरबद्धही केली होती. शैलेंद्रचे (आणि तो गेल्यावर योगेशचे) काम इतकेच की त्याच चालीवर शब्द लिहायचे. ”ओ सजना बरखा बहार आई” ये बन्सी क्यूं गाये”, “मिला है किसीका झुमका” “हरियाला सावन ढोल बजाता आया” यांची मूळ बंगाली गाणी सलीलदा डॉट कॉम इथे ऐकायला मिळतील. अर्थात शैलेंद्र आणि योगेश हे मुळातच प्रतिभावंत कवी असल्याने अशा बंधनातही त्यांनी सुंदर गाणी लिहिली हा भाग वेगळा. योगेशने त्याची आणि सलील चौधरींची पहिली भेट कशी झाली याबद्दल एके ठिकाणी लिहिले होते ते उद्बोधक आहे. ” गीतकार शैलेंद्र माझे पितासमान गुरू. त्यांचे निधन हा खरे तर दुःखद प्रसंग, पण यामुळेच माझ्यासमोर संधी चालून आली. सलीलदांच्या पत्नीशी माझी थोडीशी ओळख होती. तिच्यातर्फे सलीलदांच्या भेटीचा योग आला. पहिल्या भेटीत सलीलदांनी एक चाल पेटीवर वाजवून आणि गुणगुणून दाखवली आणि यावर काही लिहिता आले तर लिही असे सांगून ते बाजारात मासळी आणायला गेले. चालीवर शब्द सुचेनात. थोड्या वेळाने चालच विसरलो. सलीलदांचे सहाय्यक कनू घोष यांना चाल परत वाजवून दाखवायची विनंती केली तर ते माझ्यावरच चिडले. चित्रपटात गाणी लिहायची महत्त्वाकांक्षा बाळगता आणि चाल कशी विसरता वगैरे बोलून बरेच झापले. अपमान सहन न झाल्याने मी घरी जायला निघालो, पण राग आवरून अर्ध्या वाटेवरून परत आलो. चाल वगैरे जाऊ दे, आपण नुसतीच कविता लिहू असा विचार करून एक कविता लिहिली. सलीलदा परत आले, त्यांनी गुणगुणून पाहिली आणि म्हणाले “अरे वा ! छान बसतेय की चालीत” अशा रीतिने मी सलीलदांबरोबर गाणी लिहायला लागलो.”  पुढे मल्याळी चित्रपटात संगीत देतानाही त्यांनी त्याच चाली वापरल्या. आपला हृदयनाथ हिंदी चित्रपटात गाणी देताना मराठी गाण्यांसाठी दिलेल्या चालीच परत वापरतो त्याची आठवण येते.

सी. रामचंद्र आधी कविता लिहून घेऊन मगच चाल बनवत असे एके ठिकाणी वाचले. इतका हास्यास्पद दावा दुसरा नाही. “मैं हूँ एक खलासी, मेरा नाम भीमपलासी”, “आना मेरी जान संडे के संडे”, “इना मिना डिका”, “मोंबासा मोंबासा”, “शोला जो भडके दिल मेरा धडके” यासारखी असंख्य गाणी कवींनी आधी लिहिली आणि मग अण्णांनी चाल लावली यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. राजेंद्र कृष्ण सुमार दर्जाचा गीतकार आहे, एक “अनारकली” मधली गाणी सोडली तर त्याची इतर गाणी अजिबात मनाला भावत नाहीत. “परछाई” मधले “कटते है दुख में ये दिन” (गीतकार – नूर लखनवी) किवा “शिनशिनाके बुबलाबू” मधले “तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए” (गीतकार – पी. एल. संतोषी) ही गाणी खरोखर अप्रतिम आहेत पण पण सी. रामचंद्रांच्या असंख्य गाण्यांत अशी गाणी शोधणे म्हणजे म्हणजे गवताच्या पेंढीत सुई शोधण्यासारखे आहे.

शंकर – जयकिशन पैकी शंकर हा शैलेंद्रबरोबर आणि जयकिशन हसरत बरोबर काम करायचा. शंकर – जयकिशन हे नौशाद, सलील चौधरींइतके चालीबद्दल काटेकोर नव्हते. सहज गुणगुणता येतील अशा सोप्या चाली लावण्याकडे कल असल्याने शैलेंद्रलाही जास्त स्वातंत्र्य मिळत असावे.

दुसऱ्या प्रकारच्या संगीतकारांबद्दल तिसऱ्या भागात लिहीन.

कवी आणि संगीतकार – १

September 21, 2008 - 2 Responses

आपण सर्वच गाणी ऐकतो. पण चांगले गाणे म्हणजे काय याच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. काहींना एकदा ऐकल्यावर चाल आवडली तरच गाणे आवडते. शास्त्रीय गायनात गती असणाऱ्यांना त्यातल्या गमक, ताना, मुरक्या, राग, ताल  वगैरे बारकावे समजले तर गाणे आवडते आणि वादनात गती असलेल्यांना आवडीचे वाद्य असलेली गाणी आवडतात. काहींना कविता भावली तर चाल तितकी आकर्षक नसली तरी गाणे आवडते. बहुतेकांना यापैकी एकापेक्षा जास्त कारणांसाठी गाणी आवडतात.

माझी हिंदी चित्रपटसंगीताची आवड राजकपूरचे चित्रपट आणि त्यातली गाणी यापासून सुरू झाली. साधारण १५ – १६ व्या वर्षी म्हणजे १९७५ च्या सुमारास  पुण्यात रेडिओवर लागणारी गाणी आणि त्याकाळात मॅटिनीला स्वस्तात बघायला मिळणारे राजकपूरचे चित्रपट यामुळेच आमच्या बहुतेक मित्रांची गाणी ऐकण्याची, त्यावर चर्चा/वाद करण्याची  सुरूवात होत असे. शंकर – जयकिशनच्या सहज, सोप्या चाली आणि शैलेंद्रचे मनाची पकड घेणारे काव्य यामुळे ती गाणी आवडणे नैसर्गिक होते असे वाटते. याच काळात अजूनही आठवणारी गोष्ट म्हणजे “रसरंग” मध्ये वाचलेला एक लेख. त्यात त्या काळी हयात असलेल्या मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, इंदीवर वगैरे गीतकारांवर ते वाईट गाणी लिहीत असल्याबद्दल टीका केली होती आणि त्यातले समारोपाचे वाक्य होते “सुरावटीबरहुकूम अर्थपूर्ण गीते लिहिणारा एकच गीतकार होऊन गेला, तो म्हणजे शैलेंद्र”. तेव्हापासून रेडिओवर गाणे ऐकताना शैलेंद्रचे गाणे कुठले आहे आणि ते खरेच अर्थपूर्ण आहे का हे पडताळून पाहण्याचा छंद लागला आणि लक्षात आले की ते वाक्य १००% खरे होते. खरे तर राजकपूरच्या चित्रपटांसाठी हसरत जयपुरी पण गाणी लिहायचा, पण ती सर्वच सुमार होती. त्यामुळे केवळ शैलेंद्रबद्दलच नाही तर इतर गीतकारांबद्दलही कुतूहल निर्माण झाले. त्यातून पुढे लक्षात आले की शैलेंद्र, शकील बदायुनी, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, प्रेम धवन, राजेंद्र कृष्ण, कमर जलालाबादी, भरत व्यास, प्रदीप, गुलजार, योगेश आणि नीरज हे हिंदी चित्रपटसंगीतातले प्रमुख गीतकार आहेत.

यातल्या प्रत्येकाबद्दल थोडक्यात सांगतो.

शैलेंद्र – हिंदी चित्रपटसंगीतामधला सर्वात परिपूर्ण गीतकार. एकदा चित्रपटगीतांचे माध्यम स्वीकारल्यावर आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान चित्रपटगीतांमधून मांडणारे कमालीचे पारदर्शी व्यक्तिमत्व. गुलजार म्हणतात “शैलेंद्रने चित्रपटगीतांना साहित्याचा दर्जा मिळवून दिला. “

शकील बदायुनी – भावनांचा आविष्कार अत्यंत प्रभावीपणे करणारा प्रतिभावंत गीतकार.  त्यांच्या काळात फॅशनेबल असलेले समाजवादी किंवा कम्युनिस्ट छापाच्या कविता लिहिणे हे त्यांनी कधी केले नाही म्हणून त्यांचे चे नाव  आदराने घेतले जात नाही. पण माझ्या मते शैलेंद्र आणि शकील हेच दोघे गीतकार असे आहेत की ज्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, विचार, भावना या त्यांच्या गीतांमधून स्वच्छ दिसतात.

साहिर लुधियानवी – संजोप रावांच्या ब्लॉगवर मी साहिरबद्दल बरेच काही लिहिले आहे. थोडक्यात सांगायचे तर हा मनुष्य मला “ओव्हररेटेड” वाटतो. जितके कौतुक झाले तितकी चांगली गाणी नाहीत. समाजवादी /कम्युनिस्ट असल्याने आणि  “फैज अहमद फैज” यांची पोपटपंची केल्याने, उर्दू साहित्य आणि चित्रपटसृष्टी यात  बरीच प्रसिद्धी मिळाली. गुलजार यांचे  ” चित्रपटाच्या माध्यमाने साहिरला जितके स्वीकारले तितके साहिरने माध्यमाला स्वीकारले नाही” हे शब्द बरेच सांगून जातात.

मजरूह सुलतानपुरी – हा गीतकार नाही तर गाणी पाडणारा कारखाना आहे. १९४६ ते २००० इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीत किती गाणी लिहिली – याला सीमा नाही. जशी मागणी तसा पुरवठा. बरीच गाणी खराब ते अगदी खराब या प्रकारातली असली तरी  याच्या चतुरस्त्र प्रतिभेची साक्ष देणारी असंख्य सुरेख गाणी अजूनही आठवतात म्हणून याचा समावेश यादीत केला नाहीतर आनंद बक्षीप्रमाणे दुर्लक्षच करावे लागले असते.

राजेंद्र कृष्ण आणि कमर जलालाबादी – हे दोघे निव्वळ शब्दजुळवे. चालीबरहुकूम गाणी लिहितायेतात इतकेच यांच्याबद्दल लिहिता येते. काव्य फारसे नसते.

भरत व्यास आणि प्रदीप – ही नावे जोडीने घेण्याचे कारण म्हणजे बहुतेक वेळा पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक चित्रपटात या दोघांनी गाणी लिहिली आहेत. भरत व्यास संस्कृतप्रचुर हिंदीत तर प्रदीप खड्या बोलीत गाणी लिहितात. मला दोघांमध्ये भरत व्यास जास्त आवडतात. पण खरे तर या दोघांपेक्षाही जास्त प्रतिभावंत गीतकार म्हणजे नरेंद्र शर्मा. अर्थात त्यांनी अतिशय कमी गाणी लिहिल्याने इथे उल्लेख केला नाही.

गुलजार आणि योगेश – दोघांचा एकत्र उल्लेख केला कारण दोघांनी साधारण १९६० च्या सुमारास चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दोघांमध्ये मला योगेश जास्त आवडतो. गाण्यातून तत्त्वज्ञान सांगण्याची शैलेंद्रची परंपरा त्याने पुढे चालू ठेवली (आठवा “आनंद” ची गाणी). अर्थात असा मनुष्य फार काळ चित्रपटसृष्टीच्या बदलत्या काळात टिकणे शक्य नव्हते, तसेच झाले. गुलजारांची प्रतिभा बहुआयामी आहे. उत्तम चित्रपट दिग्दर्शक, संवादलेखक आहेत. इतके की अजूनही त्यांनि लिहिलेले कित्येक संवाद तोंडपाठ आहेत. पण गीतकार म्हणून टिकून राहण्यासाठी मजरूह सुलतानपुरी प्रमाणेच असंख्य व्यावसयिक तडजोडी केल्या आहेत. “सत्या” मधले “गोली मार भेजेमें” गाणी त्याचा नमुना आहे. अर्थात “गँगमधला मनुष्य ‘दिले नादाँ तुझे हुआ क्या है ‘असे न म्हणता ‘गोली मार भेजेमें’ असेच म्हणणार हे त्यांचे म्हणणेही पटते.

नीरज – खरे तर गुलजार आणि योगेशबरोबरच यांचेही नाव घ्यायला हवे कारण त्यांनीही साधारण १९६० च्या सुमारास पदार्पण केले. पण त्या आधी हिंदी साहित्यात (नरेंद्र शर्मांप्रमाणेच) नाव कमावलेले असल्याने दबदबा होता (आणि आहे). इतका की “नई उमरकी नई फसल” चित्रपटातील सर्व गीते ही त्यांच्या कवितासंग्रहातल्या कविता आहेत. योगेश यांच्याप्रमाणेच व्यावसायिक तडजोड करण्याचा स्वभाव नसल्याने कारकीर्द अल्पजीवी ठरली.

प्रेम धवन – माझे रेटिंग शैलेंद्र – शकीलच्या खालचे पण राजेंद्र कृष्ण – कमर जलालाबादींपेक्षा वरचे आहे. 

असो. प्रस्तावना बरीच भरकटली. लिहायला सुरूवात केली कारण संगीतकारांना कवितेची जाण किती असते (किंवा असते का?), त्याचा कवींच्या निवडीवर, कवितेच्या दर्जावर किती आणि कसा परिणाम होतो याबद्दल काही लिहायचे म्हणून. पण नंतर लक्षात आले की काही प्रमुख गीतकारांबद्दल जुजबी माहिती दिल्याशिवाय पुढचे विवेचन नीट करता येणार नाही. म्हणून इतके लिहिले. पुढच्या भागात कवी आणि संगीतकार या मूळ विषयावर लिहीन.

ज्ञानेश्वरी अध्याय पहिला – ओव्या ६१ – १२०

June 30, 2008 - Leave a Response

नि गंभीरपणे । स्थिरावलेनि अंत:करणे ।
आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥ ६१॥

अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।
तिहीं कृपा करून संतीं । अवधान द्यावे ॥ ६२॥

पांती – पंगतीला, परिसणया – ऐकण्यास

हे सलगीं म्यां म्हणितले । चरणां लागोनि विनविलें ।
प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ॥ ६३॥

जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।
तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४॥

तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला ।
तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५॥

उणें उपसाहला – कमीपणा सहन करालच

परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थ कवळुं पाहें ।
ते अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ॥ ६६॥

अवधारा विनवूं लाहें – ऐका अशी विनवणी करतो आहे.

हे अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।
येर्‍हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७॥

न विचारितां – विचार न करता, धिंवसा – धाडस

का टिटिभू चांचूवरी । माप सूये सागरी ।
मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥ ६८॥

टिटिभू चांचूवरी माप सूये सागरी – टिटवीने ज्याप्रमाणे चोचीने समुद्र उपसण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे

आइका आकाश गिंवसावे । तरी त्याहूनि थोर होआवें ।
म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारिता ॥ ६९॥

गिंवसावे – कवळायचे असल्यास, अपाडु – योग्यतेबाहेरचे, निर्धारिता – विचार केला असता

या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।
जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ॥ ७०॥

भवानी – पार्वती

तेथ हरू म्हणे नेणिजे । देवी जैसें का स्वरूप तुझें ।
तैसें नित्यनूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१॥

हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू ।
तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२॥

ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ॥ ७३॥

हें अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे ।
गगन मुठीं सुवावे । मशके केवीं ॥ ७४॥

महातेज कवणें धवळावे – सूर्याला कोणी प्रकाशावे, मशके – चिलटाने (आकाश मुठीत कसे घ्यावे)

परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु ।
जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५॥

येर्‍हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु ।
तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे ॥ ७६॥

सोज्वळु – लखलखीत तेजाने (स + उज्ज्वल असे असावे)

लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे ।
की मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धी ॥ ७७ ॥

लाहे – प्राप्त होते

जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकया आथी भारती ।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कायी ॥ ७८॥

मुकया आथी भारती – मुक्याला वाचा फुटेल

जयातें कामधेनू माये । तयासी अप्राप्य काही आहे ।
म्हणऊनि मी प्रवर्तों लाहे । ग्रंथी इये ॥ ७९॥

तरी न्यून ते पुरतें । अधिक ते सरते ।
करून घ्यावे हें तुमते । विनवीतु असे ॥ ८०॥

आता देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।
जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१॥

चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र – कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवील तशी नाचते

तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरोपितु ।
ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२॥

तंव श्रीगुरू म्हणती राहीं । हे तुज बोलावे न लगे कांही ।
आता ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगा ॥ ८३॥

या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु ।
म्हणे परियेसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४॥

परियेसा मना अवकाशु । देऊनियां – मोकळ्या मनाने ऐका

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किममुर्वत संजय ॥ १ ॥

तरी पुत्रस्नेहे मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ॥
म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥ ८५॥

मातु – गोष्ट

जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे ।
गेले असती व्याजें । झुंजाचेनि ॥ ८६॥

व्याजें – कारणाने

तरी तिहीं येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं ।
तें झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७॥

संजय उवाचः दृष्टा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनब्रवीत् ॥ २ ॥

तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचलले ।
जैसें महाप्रळयीं पसरले । कृतांतमुख ॥ ८८॥

तैसे तें घनदाट । उठावले एकवाट ।
जैसें उसळले कालकूट । धरीं कणव ॥ ८९॥

ना तरी वडवानलु सादुकला । प्रलयवाते पोखला ।
सागर शोषूनि उधवला । अंबरासी ॥ ९०॥

वडवानलु सादुकला – समुद्राच्या पोटातील अग्नी पेटला

तैसे दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर ।
अवगमले भयासुर । तिये काळीं ॥ ९१॥

परिकर -सज्ज असलेले

तें देखिलेयां दुर्योधनें । अव्हेरिले कवणे माने ।
जैसें न गणिजे पंचाननें । गजवटांते ॥ ९२ ॥

पंचाननें – सिंह (हतीच्या कळपांना मोजत नाही)

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ ३ ॥

मग द्रोणापासी आला । तयाते म्हणे हा देखिला ।
कैसा दळभारु उचलला । पांडवांचा ॥ ९३॥

गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह संभवते ।
हे रचिले आथि बुद्धिमंते । द्रुपद्कुमरें ॥ ९४॥

जो का तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनी कुरुठा केला ।
तेणे हा पाखरिला । देखदेख ॥ ९५॥

कुरुठा – शहाणा, पाखरिला – उभा केला

अत्रशूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ॥ ४॥

आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।
जे क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥ ९६॥

जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे ।
ते सांगेन कौतुकें । प्रसंगेचि ॥ ९७॥

एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु ।
महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥ ९८ ॥

धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजेश्च वीर्यवान ।
पुरुजित् कुंतिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ॥ ५॥

युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ: ॥ ६॥

चेकितान धृष्टकेतु । काशिश्वरु विक्रांतु ।
उत्तमौज नृपनाथु । शैब्य देख ॥ ९९ ॥

हा कुंतिभोजु पाहे । एथ युधामन्यु आला आहे ।
आणि पुरुजितादि राय हे । सकळ देखे ॥ १००॥

हा सुभद्रहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु ।
तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखे द्रोणा ॥ १०१॥

आणिकही द्रौपदीकुमर । के सकळही महारथी वीर ।
मिती नेणिजे अपार । मीनले आथि ॥ १०२ ॥

मिती – गणती

अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते ॥ ७॥

भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिंतिंजय: ।
अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्थैव च ॥ ८॥

आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक ।
ते प्रसंगे आइक । सांगिजती ॥ १०३॥

रूढ – प्रमुख

उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी ।
तुम्हीआदिकरूनि । मुख्य जे जे ॥ १०४॥

हा भीष्मु गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानू ।
रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु ॥ १०५ ॥

या एकेकाचेनि मनोव्यापारें । हे विश्व होय संहरे ।
हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि ॥ १०६॥

होय – उत्पत्ति

एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें ।
याचा अडदरु सदा वाहे । कृतांतु मनीं ॥ १०७॥

अडदरु – भीति

समितिंजयो सोमदत्ति । ऐसे आणिकही बहुत आहाती ॥
जयाचिया बळा मिती । धाताही नेणे ॥ १०८॥

धाताही – ब्रह्मदेवही

अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता: ।
नानाशस्त्रप्रहरण: सर्वे युद्धविशरद: ॥ ९॥

जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।
हो कां जे अस्त्रजात । एथूनि रूढ ।। १०९॥

हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगी ।
परी सर्व प्राणें मजचिलागी । आराईले असती ॥ ११०॥

अप्रतिमल्ल – अद्वितीय , आराईले (माझ्या बाजूला) मिळालेले आहेत

पतिव्रतेचे हृदय जैसे । पतीवांचूनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी ॥ १११॥

आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।
ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त ॥ ११२॥

निरवधि – निस्सीम, चोखडे – उत्तम

झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती ।
हे बहु असो क्षात्रनीती । एथोनियां ॥ ११३॥

ऐसें सर्वापरी पुरते । वीर दळी आमुतें ।
आतां काय गणूं यांतें । अपार हे ॥ ११४॥

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १०॥

वरी क्षत्रीयांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी गा सुभटु ।
तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं ॥ ११५॥

दळवैपणाचा – सेनापतीपदाचा, पाटु – अधिकार

आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसे पन्नासीलें ।
येणे पाडे थेंकुले । लोकत्रय ॥ ११६॥

पन्नासीलें – बांधले, थेंकुले – कःपदार्थ

आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपणा कवणा नाहीं ॥
मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा ॥ ११७॥

दुवाडपणा – दुस्तर, विरजा – साहाय्यकारी

ना तरी प्रलयवन्हि महावातु । या दोघां जैसा सांघातु ।
तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ ११८॥

सांघातु – मिलाफ

आतां येणेंसि कवण भिडे । हे पांडव सैन्य कीर थोडें ।
ओइचलेनि पाडे । दिसत असे ॥ ११९॥

ओइचलेनि पाडे – वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने

वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।
ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली असे ॥ १२०॥
बेथु – आडदांड

ज्ञानेश्वरी अध्याय पहिला – ओव्या १-६०

June 30, 2008 - Leave a Response

ओम् नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥ १॥

आद्या – सर्वांचे मूळ असणार्‍या, स्वसंवेद्या – स्वतःच स्वतःला जाणण्यास समर्थ असणार्‍या


देवा तूंचि गणेशु । सकल मतिप्रकाशु ।
म्हणे मी निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २॥

अवधारिजो जी – ऐका,


हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३॥

अशेष – संपूर्ण, वर्णवपु – (निर्दोष) वर्णरूपी शरीराचे सौंदर्य


स्मृति तेचि अवयव । देखा अंगिकभाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४॥

अष्टादश पुराणे । तीचि मणिभूषणे ।
पदपद्धती खेवणे । प्रमेयरत्नांची ॥ ५॥

मणिभूषणे – रत्नखचित अलंकार, पदपद्धती – शब्दांची छंदोबद्ध रचना खेवणे – कोंदणे


पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्यवाणे । सपूर उजाळाचे ॥ ६॥

पदबंध – शब्दरचना, नागर – उच्च प्रतीची, रंगाथिले – रंगवलेले, अंबर – वस्त्र, साहित्यवाणे । सपूर उजाळाचे – शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत पोत आहे


देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ॥ ७॥

क्षुद्रघंटिका – लहान घागर्‍या 
 

नाना प्रमेयांचि परी । निपुणपणे पाहता कुसरी ।
दिसती उचित पदे माझारी । रत्नें भली ॥ ८॥

तेथ व्यासादिकांच्या मति । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणे झळकती । पल्लवसडका ॥ ९॥

चोखाळपणे – निर्दोषपणे, पल्लवसडका – (मेखलेच्या)पदराच्या दशा


देखा षड्दर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ॥
म्हणऊनि विसंवादे धरिती । आयुधे हाती ॥ १०॥

विसंवादे धरिती । आयुधे हाती – एकमेकांशी न मिळणारी मते हीच जणू शस्त्रे


तरी तर्कु तोचि परशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकाचा ॥ ११ ॥

तर्कु तोचि परशु – कणादशास्त्ररुपी हातात अनुमानरुपी परशु
नीतिभेदु तोचि अंकुशु – गौतमीय न्यायदर्शनरुपी हातात तत्वभेद रुपी अंकुशु
वेदांतु – व्यासकृत वेदांतसूत्रे
 

एके हाति दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमत संकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥

एके हाती दंतु – पातंजलदर्शनरूपी हातात बौद्धमताचा खंडित झालेला दात


मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥ 

सत्कारवादु – निरीश्वरवादी सांख्यांचे तत्वज्ञान
धर्मप्रतिष्ठा – जैमिनिकृत धर्मसूत्रे
 

देखा विवेकमंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥ 

तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥

दशनु – दात, उन्मेषसुक्ष्मेक्षणु – ज्ञानरूपी बारीक डोळे असणारा


मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानी ।
बोधमदामृत मुनी । अलि सेविती ॥ १६ ॥

मीमांसा दोनी – पूर्व आणि उत्तर मीमांसा, बोधमदामृत – बोध हेच मदरूपी अमृत आहे,अलि – भुंगे


प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसे एकवटत । इभ मस्तकावरी ॥ १७ ॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ – वर सांगितलेल्या शृतिस्मृत्यादिकां प्रतिपादिलेली तत्वे हीच गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी आहेत.द्वैताद्वैत तेचि निकुंभ – द्वैत आणि अद्वैची मते ही गणपतीची गंडस्थळे आहेत.


उपरि दशोपनिषदे । जिये उदारे ज्ञानमकरंदे ।
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे। शोभती भली ॥ १८ ॥

दशोपनिषदे – ईशावास्य, कठ, केन, छांदोग्य, मुंडक, मांडुक्य, तैतिरिय, ऐतरिय, श्वेताश्वतर, बृहदारण्यक ही दहा उपनिषदे


अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारे ॥ १९ ॥

हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळले ।
ते मियां गुरूकृपा नमिले । आदिबीज ॥२० ॥

आता अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकला कामिनी ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियां ।। २१ ।।

मज हृदयी सद्गुरू । तेणे तारिलो हा संसारपूरु ।
म्हणऊनि विशेष अत्यादरू । विवेकावरी ।। २२ ।।

जैसे डोळ्यां अंजन भेटे । मग दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहे तेथ प्रकटे । महानिधी ।। २३ ।।

दृष्टीसी फांटा फुटे – दृष्टी फाकते, महानिधी – (भूमिगत ) द्रव्याचा खजिना


का चिंतामणी जालया हाती । सदा विजयवृत्ति मनोरथी ।।
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ।। २४ ।।

म्हणोन जाणतेनो गुरू कीजे । तेणे कृतकार्य होईजे ।
जैसे मूळसिंचने सहजे । शाखापल्लव संतोषती ।। २५ ।।

मूळसिंचने – वृक्षाच्या मूळास पाणी घातले असता फांद्या पाने यांना टवटवी येते.


का तीर्थे जिये भुवनी । तिये घडती समुद्रावगहनी ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६ ॥

समुद्रावगहनी – समुद्रस्नानाने
 

तैसा पुढतपुढती तोची । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि ।
जे अभिलषित मनोरुची । पुरविता तो ॥ २७ ॥

आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुका जन्मस्थान ॥
की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥ २८ ॥

ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधी ।
नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥ २९ ॥

की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजाता वसिष्ठ । अशेषांचे ॥ ३०॥

वसिष्ठ – श्रेष्ठ

ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥

जिव्हार – जिव्हाळा

नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।
आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥

म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥

गुरूवतीचा ठावो – मोठेपणाची सीमा, आवो – डौल

तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोवळीक । दुणावली ॥ ३४॥

शब्दश्री सच्छास्त्रिक – शब्दांच्या संपत्तीला शास्त्रीयता आली, महाबोधीं कोवळीक । दुणावली – ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली

एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।
आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥

प्रमेय रुचीस आले – तत्त्वांना गोडी आली, पोखले – पोसले,

माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भले ॥ ३६॥

एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।
म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७॥

आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥ ३८॥

नावेक – क्षणभर, बिक – विशेष सामर्थ्य

भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।
तैसे व्यासमती कवळले । अवघे विश्व ॥ ३९॥

धवळले – प्रकाशले

कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।
तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात ॥ ४०॥

भारतीं सुरवाडले । अर्थजात – महाभारतात चार पुरूषार्थ प्रफुल्लित झाले आहेत.

ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे ।
तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ ॥ ४१॥

कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥ ४२॥

प्रथमवयसाकाळी – तारुण्यात पदार्पण करताना, अंगनाअंगी – स्त्रियांच्या ठिकाणी

ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे ।
आदिलापासोनि अपाडे । जियापरी ॥ ४३॥

उद्यानी माधवी घडे – उद्यानात वसंतऋतूचा प्रवेश घडतो, आदिलापासोनी अपाडे – अपूर्व, पूर्वीपेक्षा असाधारण

नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।
मग अलंकाती बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४॥

निवाडु – वेगळेपणा

तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले ।
ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥ ४५॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी ।
पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली ॥ ४६॥

सानीव – लहानपणा

म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं ।
येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥

ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८॥

जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९॥

आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥ ५०॥

ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि ।
निवडिले निरवधि । नवनीत हे ।। ५१॥

शब्दब्रह्माब्धि – वेदरूपी समुद्राचे, निरवधि – अमर्याद

मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके ।
पद आले परिपाकें । आमोदासी ॥ ५२॥

कडसिलें – विवेकाचा कढ देऊन

जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ॥ ५३॥

जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल ॥ ५४॥

जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे।
जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं ॥ ५५॥

जैसे शारदियेचे चंद्रकळे-| । माजीं अमृतकण कोंवळे ।
तें वेंचती मवाळें । चकोरतलगें ॥ ५६॥

 
चकोरतलगे – चकोरांची पिले 

तियापरी श्रोतां। अनुभवावी हे कथा ।
अति हळुवारपणे चित्ता । आणूनियां ॥ ५७॥

हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥ ५९॥

का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६०॥

 

ज्ञानेश्वरीः प्रास्तविक

June 30, 2008 - One Response

ज्ञानेश्वरीचे लेखन पहिल्याने “मनोगत” या संकेतस्थळाकरता झाले होते. आता ती तिथे नाही. कुठेतरी वाचकांना उपलब्ध असावी म्हणून स्वतःच्या ब्लॉगवर ठेवतो आहे. मूळ लेखन सोनोपंत दांडेकरांच्या प्रतीवरून झाले आहे. जालावरच्या किंवा इतर कुठल्याही प्रतीची नक्कल नाही. मूळ लेखनात श्री. सतिश खेडकर व सौ. क्षिप्रा यांची बहुमोल मदत झाली होती तसेच “मनोगत” प्रशासकांचेही पाठबळ होते. आता रोज थोड्या थोड्या ओव्या कठीण शब्दांच्या अर्थासह लिहीत जाईन.

सार्थ रामरक्षा

January 20, 2007 - 2 Responses

मित्रहो

रामरक्षेचे श्लोक, संधिविग्रह, समासांची फोड, कठीण शब्दांचे अर्थ व एकूण अर्थ यासह द्यावेत असा प्रयत्न आहे. माझी मैत्रीण अर्चना हिच्या मदतीने बरेचसे काम झाले आहे. काही मदत जीवनजिज्ञासा यांनीही केली आहे. विशारदा, सुवर्णमयी व अदिती या मनोगतींशी झालेल्या चर्चेचाही फायदा झाला.

श्लोक निळ्या, संधिविग्रह, समासांची फोड, कठीण शब्दांचे अर्थ केशरी रंगात व एकूण अर्थ काळ्या रंगात दिले आहेत. इथे संस्कृतचे जाणकार लोक बरेच आहेत. त्यांनी चुका जरूर दाखवाव्यात आणि हा अनुवाद परिपूर्ण करण्यासाठी मदत करावी ही विनंती. श्लोक हे विकीपीडियावरून घेतले आहेत.

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
बुधकौशिकऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता ।
अनुष्टुप् छ्न्दः । सीता शक्तिः ।
श्रीमद् हनुमान् कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।

कीलकम् – आधारस्तंभ,कवच

अर्थ – या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा ऋषि (रचणारा) बुधकौशिक असून छंद (वृत्त?) अनुष्टुभ् आहे, सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत, सीता शक्ती आहे, हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामचंद्राच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूप मंत्र निर्माण केला आहे

अथ ध्यानम् ।
ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम् ।
बद्धपद्मासनस्थम् ।
पीतं वासो वसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥
इति ध्यानम् ।

ध्यायेदाजानुबाहुं - ध्यायेत् + आजानुबाहुं,  नीरदाभम् – नीरद म्हणजे मेघ,  त्याच्यासारखी कांती असणारे श्रीराम, दधतमुरुजटामण्डनं - दधतम् + उरू + जटामंडनं , दधतम् - धारण करणारा, उरू - विस्तृत, मोठ्या, जटामंडनं - जटांनी सुशोभित असलेला

अर्थ – आता ध्यानाची सुरुवात करू या. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचे ध्यान करू या. त्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामांची कांती मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे. मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभीत झालेला आहे.

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ ॥

शतकोटिप्रविस्तरम् - शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत, पुंसां – पुरुषांची

अर्थ – श्रीरामाचे चरित्र शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे. त्याचे केवळ एक अक्षरसुद्धा पुरुषाची मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे.

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥ २ ॥

नीलोत्पलश्यामं – नील + उत्पल + श्यामं, उत्पल – कमळ, राजीव – कमळ, जानकीलक्ष्मणोपेतं – जानकी + लक्ष्मण + उपेतं, म्हणजे सीता आणि लक्ष्मण ज्याच्या जवळ आहेत असा

अर्थ – नीलकमळासारखा सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे. सीता आणि लक्ष्मण ज्याच्या सन्निध असून ज्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥ ३॥

सासितूणधनुर्बाणपाणिं – स + असि + तूण + धनुर् + बाण + पाणिं, असि = तलवार, तूण = भाता, म्हणजे धनुष्यबाण आणि भात्याबरोबरच तलवारही हाती असणारे, नक्तंचरान्तकम् – नक्तं + चर + अंतकम्, नक्तं – रात्र, नक्तंचर – निशाचर म्हणजे दानव, राक्षस, नक्तंचरांतकं – राक्षसांचा नाश करणारा, जगत्त्रातुमाविर्भूतमजं – जगत्रातुम् + आविर्भूतम् + अजम्, जगत्रातुम्  – जगत् + त्रातुम् , म्हणजे जगाच्या रक्षणासाठी , आविर्भूतम् – स्वतःला प्रकट केले आहे, अजम् म्हणजे जन्मरहित आणि म्हणूनच मृत्युरहित सुद्धा. विभुम्- व्यापून उरणारा. ह्या शेवटच्या दोन ओळींतील विशेषणे श्रीरारामाच्या रुपाने अवतार घेणाऱ्या परमात्म्याला श्रीविष्णूला लागू होतात,  

अर्थ –  आणखी एक म्हणजे मूलत: जन्मरहित व सर्वव्यापक असूनही त्याने जगाच्या रक्षणासाठी स्वतःस मर्यादित स्वरूपात सहज लीलेने प्रकट केले आहे. बाकी अर्थ सहज स्पष्ट होईल

रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४ ॥

प्राज्ञः – प्रज्ञावान, सूज्ञ पुरुष, पापघ्नीं – पापाचा नाश करणारी (रामरक्षा)  सर्वकामदाम् – काम – इच्छा. सर्व इच्छा पूर्ण करणारी (रामरक्षा) असा अर्थ

 अर्थ – रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचे पठण करावे.(दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते) रघूच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो.

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५ ॥

मखत्राता – मख म्हणजे यज्ञ, त्राता म्हणजे रक्षण करणारा,

अर्थ – कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो, विश्वामित्राला प्रिय (असलेले श्रीराम) माझ्या कानांचे रक्षण करोत, इथे विशेषणाची चपखलता लक्षात घेण्यासारखी आहे. श्रुतींसाठी विश्वामित्राशी संबंधित विशेषणच का, कारण विश्वामित्राने श्रुतींद्वारे म्हणजे कानांद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले.  यज्ञाचे रक्षण करणारे (श्रीराम) माझ्या नाकाचे रक्षण करोत तर सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे (श्रीराम) माझ्या मुखाचे रक्षण करोत.

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६ ॥

भग्नेशकार्मुकः – भग्न + ईश + कार्मुक:, ईश – शंकर, कार्मुक – धनुष्य, शिवधनुष्य भंग करणारे (श्रीराम)

अर्थ – विद्येचा खजिना असलेले  माझ्या जिभेचे रक्षण करोत (जीभ कारण तिच्या टोकावरच विद्या नर्तन करते असे मानतात) तर भरताला वंदनीय असलेले  माझ्या कंठाचे रक्षण करोत. दिव्य शस्त्रास्त्रे असलेले माझ्या खांद्यांचे रक्षण करोत (खांद्यांचे कारण कदाचित काही अस्त्रे चालवण्यासाठी खांद्यांचा आधार घ्यावा लागत असावा). तर शिवधनुष्याचा भंग करणारे माझ्या भुजांचे रक्षण करोत (ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले म्हणून हात).

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७ ॥

जामदग्न्यजित्  – जमदग्निपुत्र परशुरामाला जिंकणारे श्रीराम

अर्थ – सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत (पतीचा एक अर्थ रक्षणकर्ता. सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करो असे काहीसे) तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचे रक्षण करोत तर जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभिचे रक्षण करोत.

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८ ॥

अर्थ – सुग्रीवाचे देव माझ्या कंबरेचे रक्षण करोत तर हनुमंताचे प्रभु माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करोत. रघुकुळातले उत्तम (पुरुष) व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करोत

जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥ ९ ॥

वपुः – शरीर

अर्थ – सेतु बांधणारे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत तर दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत. बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १० ॥

अर्थ -(इथे कवच संपून फलश्रुति सुरू होते)  जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असा रक्षेचे (कवचाचे) पठण करेल तो दीर्घायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः -  याची फोड पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः अशी आहे. पातालभूतलव्योमचारिण: – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः – कपटी, मायावी खोटे सोंग घेणारे (राक्षस)

 दुसऱ्या ओळीचा अर्थ – रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे (पहिल्या ओळीत वर्णन केलेले) मायावी आणि कपटी राक्षस  नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ।। १२ ॥

अर्थ – राम अथवा रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही व त्याला सुखोपभोग आणि मुक्ति मिळतात.

जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
यः कन्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिध्दयः ॥ १३ ॥

जगज्जैत्रेकमन्त्रेण  – जगज्जेत्रा + एकमन्त्रेण जग जिंकणाऱ्या एका मंत्राने, रामनाम्नाभिरक्षितम् – रामनाम्ना + अभिरक्षितम् – रामनामाने सर्व बाजूंनी रक्षण होते

अर्थ – सर्व जग जिंकणाऱ्या या रामनामरूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते. जो हा मंत्र कंठात धारण करतो (पाठ करतो) त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात.

वज्रपञ्जरनामेदमं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४ ॥

अव्याहताज्ञः – म्हणजे त्याची आज्ञा कधीही मोडली  जात नाही असा

अर्थ – हे कवच वज्राचा पिंजऱ्यासारखे अत्यंत संरक्षक असल्याने याला वज्रपंजर असे नाव आहे. ह्या कवचाचे जो नित्य स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५ ॥

अर्थ – भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली त्याप्रमाणे सकाळी उठून बुधकौशिक ऋषींनी ती लिहिली.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६ ॥

आरामः – बाग, वन, विरामः – शेवट करणारा, सकलापदाम् – सकल + आपदाम् – म्हणजे सर्व दु:खसंकटांचा, अभिरामस्त्रिलोकानां – अभिराम: + त्रिलोकानां – तिन्ही लोकांना आवडणारा, श्रीमान् – श्रीमंत, स नः प्रभुः – तो आमचा देव आहे

यापुढील (२०व्या श्लोकापर्यंतचे)वर्णन श्रीराम व लक्ष्मण या दोघांचे आहे.

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७ ॥

पुण्डरीक – कमळ,  विशालाक्षौ – (कमळाप्रमाणे) मोठे डोळे असलेला, चीरकृष्णाजिनाम्बरौ – चीर + कृष्णाजिन + अंबरौ, चीर – वल्कले, कृष्णाजिन – काळवीटाचे कातडे, अंबरौ – वस्त्राप्रमाणे धारण करणारे.

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८ ॥

फलमूलाशिनौ  – फल + मूल + अशिनौ, म्हणजे फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, दान्तौ – इंद्रिये दमन करणारे, जितेंद्रिय

अर्थ – फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी असे हे दशरथाचे दोन पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे राम व लक्ष्मण.

शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९ ॥

शरण्यौ सर्वसत्वानां – सत्त्व म्हणजे प्राणी. याचा अर्थ सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान

अर्थ- सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुळातले श्रेष्ठ वीर, म्हणजे राम व लक्ष्मण, आमचे एअक्षण करोत.

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम् रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥ २० ॥

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ – आत्तसज्जधनुषौ + ईषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ, पैकी आत्तसज्जधनुषौ – आत्त + सज्ज + धनुषौ + ईषुस्पृशौ यातील आत्त- धारण केलेले, ईषुस्पृशौ – ईषु म्हणजे बाण, बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले (रामलक्ष्मण) असा एकूण अर्थ आणि अक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ – अक्षय + आशुग + निषङ्ग + सङ्गिनौ,  यातील अक्षय – म्हणजे कधीही न संपणारा, आशुग – पुढे जाणारा बाण, निषङ्ग – भाता, सङ्गिनौ – जवळ असलेले, रामलक्ष्मणावग्रतः- रामलक्ष्मणौ + अग्रतः , अग्रतः= पुढे

अर्थ - बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले  तसेच पुढे जाणाऱ्या बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता जवळ असलेले(श्रीराम व लक्ष्मण) माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी माझापुढे चालोत.

संनद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१ ॥

संनद्धः – निरंतर सज्ज, कवची – चिलखत घातलेला,

अर्थ – चिलखत घातलेल्या व धनुष्य, बाण व तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरूण श्रीरामामुळे आमचे मनोरथ सिद्धीस जावोत आणी लक्ष्मणासह श्रीराम आमचे रक्षण करोत. 

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥ २२ ॥

काकुत्स्थः – ककुत्स्थ हे श्रीरामांच्या कुळाच्या मूळ पुरुषाचे नाव. त्याच्या कुळात जन्म झाला म्हणून श्रीराम काकुत्स्थ.

अर्थ – दशरथपुत्र श्रीराम शूर आहे, लक्ष्मणासारखा बलवान मनुष्यही ज्याच्या पावलावर पाऊल ठेऊन चालतो असा (महान) आहे. ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ आहे.

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥ २३ ॥

वेदान्तवेद्यो – वेदांत हे ज्याला जाणून घ्यायचे साधन आहे असा, पुराणपुरुषोत्तमः – सनातन पुरुष, जानकीवल्लभः – सीतेचा पति, श्रीमानप्रमेयपराक्रमः – श्रीमान् + अप्रमेय + पराक्रमः, अप्रमेय – ज्याच्या पराक्रमाची मोजदाद करता येत नाही असा पराक्रमीइत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४ ॥
अर्थ – ह्या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही.

रामंदूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः ॥ २५ ॥

अर्थ -  दूर्वादलासारखे सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पिवळे वस्त्र परिधान केलेल्या (अशा) श्रीरामांचे दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या/ जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होतात.

रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरं सीतापतिं सुन्दरम् ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ॥ २६ ॥

राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिम् ॥ २७ ॥

२६ व २७ श्लोकांचा एकत्र अर्थ -श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती, व सुंदर आहेत. तसेच ककुत्स्थ कुळातले, करूणेचे सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत. राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेले, दशरथपुत्र, सावळे व शांततेची मूर्ती आहेत. लोकांना प्रिय असणाऱ्या, रघुकुळात तिलकाप्रमाणे शोभणाऱ्या, रावणाच्या शत्रू आहेत. अशा (गुणांनी युक्त) श्रीरामांना मी वंदन करतो.

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २८ ॥

वेधसे - प्रजापतिला

अर्थ – मी रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला वंदन करतो.

श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ॥
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २९ ॥

अर्थ – श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत, भरताचे थोरले बंधु आहेत, रणांगणावर शूरवीर आहेत. अशा श्रीरामांना मी शरण आहे.

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ॥
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ३० ॥

अर्थ – मी श्रीरामांच्या चरणांचे मनाने स्मरण करतो, वाणीने गुणवर्णन करतो, शिरसाष्टांग नमस्कार करतो व शरण जातो.

माता रामो मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ॥
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः ।
नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ ३१॥

अर्थ – श्रीराम माझी माता आहेत, पिता आहेत, स्वामी आहेत, मित्र आहेत. दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही.

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥ ३२ ॥

अर्थ – ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे तसेच डाव्या बाजूस सीता आहे पुढे मारुती आहे अशा श्रीरामांना मी वंदन करतो.

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥ ३३ ॥

अर्थ – लोकांना प्रिय असलेल्या, रणांगणावर धीरगंभीर असलेल्या, कमळाप्रमाने नेत्र असलेल्या, रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या, कारुण्याची मूर्ति असलेल्या, दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो.

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ ३४ ॥

अर्थ – मनाप्रमाणे, वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ, पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या (हनुमानाला) मी शरण आहे.

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥ ३५ ॥

अर्थ – कवितेच्या शाखेवर बसून वाल्मिकीरूपी कोकिळ राम राम अशा मधुर अक्षरांचे कूजन करत आहे, त्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो.

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३६ ॥

आपदामपहर्तारं – आपदाम् + अपहर्तारं – दु:खसंकटांचा नाश करणाऱ्या, भूयो भूयो – पुनः पुनः

अर्थ – दु:खसंकटांचा नाश करणाऱ्या, सुखसमृद्धी देणाऱ्या, लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुनः पुनः नमन करतो. 

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥ ३७ ॥

अर्थ – संसारवृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुखसमृद्धी मिळवण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना (जप) करावा.

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ॥ ३८ ॥

अर्थ – (या आणि पुढच्या श्लोकात राम शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत). राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो. मी रामाला, रमेशाला म्हणजेच रमेच्या पतीला- विष्णुला भजतो. रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले. त्या रामाला वंदन असो.

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ ३९ ॥

अर्थ – रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझा चित्तवृत्तीचा लय होवो आणि हे राम माझा उद्धार कर.

रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने ॥ ४० ॥

वरानने – सुवदने,

अर्थ – (शंकर पार्वतीला सांगतात) हे सुमुखी, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव (विष्णूच्या) हजार नावांच्या बरोबरीचे आहे.

इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्त्रोत्रं सम्पूर्णम् ।

अर्थ – श्रीबुधकौशिकऋषींनी रचलेले श्रीरामरक्षा नावाचे स्तोत्र इथे संपले.

॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

अर्थ – हे स्तोत्र श्रीराम व सीतेला अर्पण असो.

॥ शुभं भवतु ॥

Hello world!

January 18, 2007 - One Response

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!